
जळगाव दि. ११ (जनसंवाद न्युज): महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक / युवतीसाठी वाढती संख्या व उद्योग/ व्यवसाय विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वंयरोजगार/रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवुन उद्योजकांना चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2019 सुरु केली आहे. ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

कोणतेही स्थायी उत्पन्न नसलेले 18 ते 456 वर्ष वय असलेले अर्जदार यासाठी पात्र असणार आहे. यामध्ये अनु.जाती/जमाती/महिला/इतर मागास वर्ग/दिव्यांग/माजी सैनिक/विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक यांच्यासाठी 5 वर्ष शिथील करण्यात आले आहेत. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण , रु.25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा ही अट बंधणकारक असणार आहे. यामध्ये उत्पादन उद्योगासाठी रु.50 लाख व सेवा उद्योगासाठी रु.20 लाख पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या योजनेत अनु. जाती/जमाती/महिला/इतर मागास वर्ग/दिव्यांग/माजी सैनिक/विमुक्त व भटक्या जमाती/अल्पसंख्याक या प्रवर्गातील अर्जदार शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान त्यासाठी लाभार्थींना 5 टक्के स्वगुंतवणूक करावी लागणार आहे. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थींना 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
या योजनेसाठी http://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करतांना अर्जदारास स्वत:चा फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र, मार्कशीट, पॅन कार्ड, उद्योगाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, हमीपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.
जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगांव यांनी केले आहे.