जळगावताज्या बातम्या

जळगाव विमानतळावर धक्कादायक प्रकार, राज्यपालांना पोलीस बॅण्ड पथक विनाच सलामी

राज्यपाल विद्यापीठाकडे रवाना झाल्यावर बॅण्ड पथक पोहोचले विमानतळावर

जळगाव, दि. 8 (जनसंवाद न्युज): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दिक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सकाळी 9 वाजता राज्यपालांचे विमानतळावर आगमन होणार होते. सर्व प्रशासन अधिकारी प्रोटोकॉल नुसार वेळेच्या आधी हजर झाले. सलामी देणारे पोलीस प्लाटुन आपल्या जागेवर हजर होते, राज्यपालांचे विमान आठ वाजून 55 मिनिटांनी विमानतळावर लॅन्ड झाले.

पोलीस बॅण्ड पथक हजर नसल्याने सलामी देण्याऱ्या पोलीस प्लाटुनमध्ये कुजबुज सुरू झाली, पोलीस बॅण्ड पथक अजुन आले नाही. कोणी फोन लावा बॅण्ड पथकला, बिना बॅण्ड पथकाची सलामी द्यायची का राज्यपालांना? अशी कुजबुज सुरू होती. तेवढ्यात स्वागत कक्षातुन राज्यपालांचे सलामी ठिकाणी आगमन झाले, पोलीस प्लाटुन तर्फे बॅण्ड पथक विनाच सलामी देण्यात आली. राज्यपालांना सलामी दिल्या नंतर त्यांचा ताफा विद्यापीठ कडे रवाना झाला. त्यानंतर पोलीस बॅण्ड पथकाचे विमानतळावर आगमन झाले. तेही अगदी घाईघाईत.

जळगाव: राज्यपाल विमानतळावरून विद्यापीठाकडे रवाना झाल्यानंतर उशिरा पोहोचलेले पोलीस बॅण्ड पथक

आमच्या प्रतिनीधीने त्यांचे व्हिडीओ शूटींग व फोटो काढले असता त्यातील एक जण जवळ येऊन म्हणाला जाऊ द्या साहेब कशाला फोटो घेता, आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. शेवटी आम्ही गाडीतुन खाली उतरलो आणी पळत पळत विमानतळावर पोहोचलो. त्यातील दुसरा कर्मचारी म्हणाला की साहेब मला नोकरीत 34 वर्ष झाले. माझ्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. पुन्हा एकदा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन उघड झाल्याचे निदर्शनास आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button