
जळगाव, दि. 12(जनसंवाद न्युज): जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. या ठिकाणी रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी सातला उघडकीस आली. घडल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत तिघांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जळगाव खुर्द हे अंतर आठ-दहा किलोमीटर आहे. येथून पाळधी ते तरसोद राष्ट्रीय महामार्ग गेला असून, आता नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे कामही प्रगतिपथावर आहे. याच पुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. याच रस्ता आणि पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. मंगळवारी (दि. 11) मध्यरात्री सिकंदर नाटूसिंग राजपूत, भूपिंदर मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहादूर (तिघे, रा. उत्तर प्रदेश) सर्व्हिस रोडवर बांधकामाचे साहित्य व पट्टी टाकून झोपले होते. तिघे गाढ झोपेत असताना, अज्ञात वाहन तिघांना चिरडून निघून गेले. अज्ञात वाहनाने तिघांना चिरडून टाकल्याचे सकाळी सातच्या सुमारास इतर मजुरांना दिसून आले. ये-जा करणारे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळावर गर्दी केली. घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.