डॉ. आंबेडकर म्हणजे जातीधर्मापलीकडे भारतीयांसाठी लढणारा योद्धा : डॉ. बाबुराव वाघ

जळगाव, दि.14 (जनसंवाद न्युज): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेती आणि शेतकरी विषयक धोरण, मजूर आणि कामगार विषयक कायदे, महिलांच्या सबलीकरणासाठी हिंदू कोडबिल, सायमन कमिशन समोर आणि गोलमेज परिषदेत १८ वर्षांवरील सर्व स्री पुरुषांना मतदानाच्या अधिकाराची मागणी, सर्व जनतेला समानतेच्या तत्त्वावर स्वातंत्र्य आदी महत्त्वाचे कायदे या देशाला करुन दिले. यावरुन डॉ. आंबेडकर म्हणजे जातीधर्माच्या पलिकडे जाऊन सर्व भारतीयांसाठी लढणारा अनंत पैलुचा सामाजिक योद्धा होता असे स्पष्ट झाले आहे. असे मत डॉ. बाबुराव वाघ यांनी व्यक्त केले.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून नूतन मराठा महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवायोजन विभागाच्या वतीने जातीधर्मा पलिकडचे बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, राष्ट्रीय सेवायोजन अधिकारी डॉ. पी. बी. पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी देखील डॉ. बाबासाहेबांना जातीधर्माच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही, याचा पुनरुच्चार करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा झरा फक्त जयंती पुण्यतिथी पर्यंत सिमीत नसावा तो चिरंतन ठरावा यासाठी असे व्याख्यान झाली पाहिजेत असे सांगितले. प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी सुत्रसंचलन तर डॉ. राहुल संदानशिव यांनी आभार मानले.